⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

शेतकऱ्यांची चिंता वाढणार? विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्याला पुन्हा पावसाचा इशारा, पण कधी पासून?

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने काही भागात विश्रांती घेतली आहे. तर काही भागात अद्यापही पाऊस सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यात देखील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून अशातच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. Jalgaon District Rain Alert Update

हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, १, ३ ऑक्टाेबरपर्यंत मान्सून सातपुडा ओलांडून खान्देशात प्रवेश करेल. दसऱ्याला पुढील दाेन दिवस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जाेरदार पावसाचा अंदाज आहे.

राज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसात दमदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली दिसून आली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला होता. मात्र हवामान खात्याकडून सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता.

त्यानुसार जिल्ह्यात गणेश विसर्जन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता जिल्ह्यात पुढील तीन दिवस मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच परतीचा मान्सून खान्देशातून ५ ऑक्टाेबरपासून परत जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. ५ ते ७ ऑक्टाेबर राेजी उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जाेर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसणार आहे.