⁠ 
रविवार, मे 5, 2024

जळगावला तीन मंत्रीपदे! गिरिष महाजन, गुलाबराव पाटलांनंतर अनिल पाटलांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ

जळगाव लाईव्ह न्यूज | २ जुलै २०२३ | राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार त्यांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्री झाले आहेत. यात अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्याने जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रीपद मिळाले आहे. जिल्ह्यात आधी गिरीष महाजन व गुलाबराव पाटील यांच्या रुपाने दोन मंत्रीपदे आहेत. आता जळगावला तिसरे मंत्रीपद मिळाले आहे. जिल्ह्याच्या इतीहासात प्रथमच तीन मंत्रीपदे मिळाली आहे.

अनिल भाईदास पाटील हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. अनिल पाटील यांनी जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँक, नगरपरिषद अशा एकूण १६ निवडणुका लढवल्या असून दोनदा भाजपकडून विधानसभेतील पराभव वगळता त्यांनी नेहमी विजय मिळवला आहे. २०१७ त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद देखील आहे. खान्देशातील राजकारणात त्यांनी एक चांगलं स्थान मिळवलं आहे. त्यांच्या अमळनेर मतदारसंघात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकताच जळगाव जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौर्‍याचे नियोजन अनिल भाईदास पाटील यांच्यावरच होते. शरद पवारांचा दौरा यशस्वी पार पाडल्यानंतर त्यांनी अचानक राष्ट्रवादीला रामराम करुन अजितदादांच्या सोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याने आता जळगाव जिल्ह्याच्या राजकाराणाची गणिते देखील बदलणार आहेत.

गत काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी त्यांच्या समर्थकांनी राजीनामाअस्त्र उपसले होते. यात अनिल पाटील यांचाही समावेश होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे पाठविला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचे नेतृत्व स्विकारले आहे.