⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव जिल्ह्यासाठी जास्तीच्या सतराशे शिव भोजन थाळ्यांची मंजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । सध्या राज्यात लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर एका महिन्यासाठी गरीब आणि गरजू लोकांसाठी राज्य सरकारकडून शिव भोजन थाळी नि:शुल्क देण्यात येणार आहे.

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे स्थलांतरीत मजूर तसेच बाहेरगावचे विद्यार्थ्यांचे जेवणाअभावी हाल अपेष्टा होवू नये म्हणून एक महिन्यांसाठी शासनाने जिल्ह्यासाठी वाढील सतराशे शिव भोजन थाळ्यांची मंजुरी दिली. त्यामुळे आता जिल्ह्यात दररोज ५ हजार १२५ शिव भोजन थाळ्या मिळणार आहेत.

 

शिवभोजन थाळी १५ एप्रिल ते १४ मे पर्यंतच्या कालावधीसाठी राहणार आहे. शिव भोजन केंद्रावर निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे पालन करुन शिव भोजन केंद्रातून सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत पार्सल सुविधेव्दारे ग्राहकांना शिव भोजन उपलब्ध करुन द्यावे. या वेळेत कोणताही लाभार्थी शिवभोजनाशिवाय परत जाणार नाही,याची दक्षता घ्यावी.

 

संपूर्ण शिव भोजन केंद्राचे निर्जंतुकीकरण करावे. शिव भोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तसेच पार्सल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. खोट्या नावाने तसेच तीच ती लाभार्थ्यांची छायाचित्रे शिव भोजन अॅपवर टाकली जाणार नाही.

 

याची खबरदारी केंद्र चालकाने घ्यावी. केंद्राची पुरवठा यंत्राद्वारे या महिन्यात किमान एक वेळा काटेकोर तपासणी करण्यात यावी. सर्व तहसीलदार यांनी ही बाब तत्काळ शिव भोजन केंद्र चालकांच्या निदर्शनास आणून द्यावी. त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.