जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्र सुरू करण्यात यावे. तसेच जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्राची मुदत वाढवण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आज आंदोलन करण्यात आले.

कॉंग्रेसने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र (सीसीआय) बंद करण्यात येत आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक म्हणून अमळनेर तालुका अग्रगण्य आहे. वारंवार अधिकाऱ्यांकडे मागण्या करूनही अमळनेरला सीसीआय केंद्र सुरू झालेले नाही. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
त्यामुळे अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्र सुरू करण्यात यावे. तसेच जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्राची मुदत वाढवण्यात यावी, सोयाबीन व तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.