⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कडक उन्हाळा! काय काळजी घ्याल?

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । यंदा उन्हाळा तीव्र स्वरुपाचा असल्याने मार्च मध्येच मे महिन्यातील उष्णता जाणवायला लागला आहे, अनेक ठिकाणी तापमात ३८ ते ४० अंशावर गेले आहे, उष्णता वाढली की, अनेक आजार डोके वर काढतात.

अशावेळी तब्येतीची काळजी घेणे खूपच गरजेचे असते, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिणे आदी बाबींचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उन्हाळ्यातील आजार
उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड, लहान मुलांमधील जंतुसंसर्ग, गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, मुतखडा, लघवी मार्गाचा जंतुसंसर्ग.

काय काळजी घ्याल

पचायला हलका व कमी आहार घ्यावा. यामध्ये मुगाची खिचडी किंवा वरण-भात तसेच सर्व पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.

थंड तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताकही घ्यावे. मांसाहार टाळावा.

भरपूर पाणी प्यावे

उन्हाळ्यात घामाच्या रुपाने उष्णता बाहेर पडत असते. त्यामुळे आतून व बाहेरून शरीराची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. त्यापुळे वेळोवेळी थंड पाणी प्यावे. हे पाणी माठातील असावे. उन्हातून आल्यानंतर तत्काळ पाणी पिणे टाळावे.

उष्माघात टाळण्याठी

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने चक्कर येते. डोळ्यासमोर अंधारी येते. अशावेळी रुग्णाला थंड वातावरणात शांत झोपवावे, शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे.

डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा, लिंबू सरबत घ्यावे, ताप आला तर डॉक्टरांना दाखवावे, उन्हात घराबाहेर पडणे टाळावे, असे डॉक्टरांनी सांगितले.