⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

९ मीटरच्या वरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे शक्य !

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३। जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांना अमृत योजनेचा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, शहरातील सर्व ९ मीटर व त्या पेक्षा जास्त रुंदीचे रस्ते नागपूर शहराप्रमाणे काँक्रिट करणे शक्य होणार आहे. रस्त्यांच्या मधोमध दीड मीटर डांबरी व रस्त्यांच्या दोन्ही कडेला एक- एक मीटर पेव्हर ब्लॉक बसवून मधल्या पट्ट्या काँक्रिट करता येणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.

शहरातील विविध भागातील २६७ रस्ते तयार करण्याकरीता शंभर कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. ही कामे लवकरात लवकर व्हावे, अशी सर्व जळगावकरांची मागणी आहे. परंतु या कामामध्ये अमृत योजने अंतर्गंत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेच्या भूमिगत गटारींची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शहरातील ७५ टक्के भागात भूमिगत गटारी बाकी असल्यामुळे तेथील रस्ते करायचे तरी कसे असा प्रश्न मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाला पडला आहे. या अनुषंगाने सोमवारी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी रस्त्यांच्या नियोजनासाठी बैठक घेतली.

या बैठकीत नागपूर प्रमाणे रस्त्याच्या मधोमध दीड मीटर डांबरीकरण व रस्त्याच्या दोन्ही कडेला एक- एक मीटर सोडून काँक्रिटीकरण करावे, असे नगरसेवकांनी सुचविले. तसेच दोन्ही कडेला सोडलेल्या भागात पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावे, म्हणजे रस्त्यांच्या मध्ये भूमिगत गटारी व चेंबर आणि आजू बाजूला घरांचे चेंबर असलेली लाईन टाकता येईल, असे सूचित करण्यात आले होते. परंतु हे सर्व नऊ मीटर पेक्षा मोठ्या रस्त्यांवरच करता येईल व ९ मीटर पेक्षा लहान रस्त्यांवर मधोमध दीड मीटर डांबरी करण व आजू बाजूला एक एक मीटर पेव्हर ब्लॉक बसविणे अशक्य असल्याचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले होते.

कुलभूषण पाटील यांच्या म्हणण्यात तत्थ असून ६ मीटर व त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर साडे तीन मीटर डांबरी अन् पेव्हर ब्लॉकसाठी सोडले तर, अडीच मीटर मध्ये डांबरीकरण करणे अशक्य आहे. तसे केल्यास वाहतुकीसाठी रस्ता देखील कमी शिल्लक राहिल व हा रस्ता जास्त दिवस टीकणार नाही, त्यामुळे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रित सर्वेक्षणकरून ९ मीटर, १२ मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची कामे नागपूर प्रमाणे हाती घेतली पाहिजे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.