⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात ९ टक्क्यांनी वाढ ; आता इतके टक्के जलसाठा

जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ जुलै २०२३ | सतत चार वर्षांपासून शंभर टक्के भरणाऱ्या आणि निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा पावसाळ्यापुर्वी १९ टक्के होता. गिरणा धरण क्षेत्रात पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी पाणीसाठ्यात वाढ झाली नव्हती. मात्र पाच दिवसांत मालेगाव भागात झालेल्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात नऊ टक्क्यांनी वाढून हा जलसाठा आता २८ टक्क्यांवर गेला आहे.

गिरणा धरणात तीस टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाल्यास वर्षभराची पाण्याची चिंता मिटते, असा अनुमान आहे. १९६५ मध्ये बांधलेले गिरणा धरण हे २०१८ नंतर सलग चार वर्षे पूर्णपणे भरले गेले. मात्र यंदा जुलै महिना उलटत आला तरी धरणात पुरेसा जलसाठा झालेला नाही. राज्यात बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. मात्र धरण क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मालेगाव भागातील चणकापूर, ठेंगोडा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने गेल्या तीन, चार दिवसांत धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. शनिवार (ता. २९) गिरणातील जलसाठा हा २१ टक्क्यांवरून २८ टक्के झाला आहे. आणखी दोन, तीन दिवसांत हा जलसाठा ३० टक्क्यांपर्यंत जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान गिरणावरील हरणबारी धरण ‘ ओव्हर फ्लो ‘ झाले आहे. धरण भरल्याने मोसम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. भावली धरण ओव्हरप्लो झाल्यानंतर हरणबारी धरण १०० टक्के भरले आहे. बागलाण मधील पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या सांडव्या वरुण पाणी मोसम नदीपात्रातून वाहू लागले. हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे मोसम नदीकाठच्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे. तर मोसम नदीतून वाहणारे पाणी पुढे गिरणा धरणात पोहचत असल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.