जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । राज्य सरकारने शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना या वाढीव डीएचा लाभ होणार आहे.

कर्मचाऱ्यांचा वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढतो. मागच्या वेळी २ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढला त्यानंतर आता पुन्हा महागाई भत्ता वाढला आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली असून त्यानंतर आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्क्यांवर झाला आहे. या वाढीमुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त पैसा येणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या सात महिन्यांच्या फरकाची रक्कम एकत्रितपणे दिली जाणार आहे.

सणासुदीच्या काळात ही वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाढीव पगारासह सात महिन्यांची एकत्रित रक्कम मिळणार असल्यामुळे दसरा आणि दिवाळीसारख्या सणांसाठी आवश्यक असलेला खर्च भागवणे सोपे होईल.







