⁠ 
सोमवार, मे 20, 2024

मंत्री दादा भुसेंसमोरच शेतकऱ्यांनी दिल्या ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | कृषी मंत्री दादा भुसे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी शनिवारी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या पहिल्याच दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. साक्री तालुक्यातील कासारे गावात शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या समोरच ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या.

कांद्याला भाव मिळत नाही, साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नाही. यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी हे आक्रमक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ‘५० खोके… मंत्री ओके …’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. तर मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकरी मंत्री दादा भुसे यांचे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते.

राज्यासह धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. दुसरीकडे त्यांना मदत करण्याऐवजी नवनिर्वाचित मंत्री महोदय आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामात व्यग्र आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नही काहीही देणे घेणे नाही, त्यांना सामान्य नागरिकांच्या प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही, शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता त्यांना मदत होणे अपेक्षित आहे. मात्र तशी मदत होताना दिसत नाही, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.