⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

महत्वाची बातमी : मनपा कर्मचाऱ्यांवरील लेखा परिक्षणातील आक्षेप होणार दूर

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेतील ११८७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व पदोन्नत्यांवर विशेष लेखा परिक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. सदर कर्मचाऱ्यांची भरती व पदोन्नत्यामध्ये झालेली अनियमितता दूर करून त्या कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंगळवारी मनपाचे सहा.आयुक्त उदय पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिली व आठ दिवसात निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


तत्कालिन जळगाव नगरपालिकेत सन १९९१ ते १९९७ दरम्यान, झालेल्या भरती व पदोन्नतीवर मनपाच्या लेखा परिक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. यामध्ये नियमानुसार पदोन्नती व भरती झाली नसल्याचे नमुद करत ११८७ कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. सुरुवातीला सदर भरती व पदोन्नत्यांमध्ये तत्कालिन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व आस्थापना विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात आले होते. परंतु दि.२० सप्टेंबर २०२१ रोजी शासनाने त्या भरती व पदोन्नत्यांना २० वर्षांहून अधिक कालावधी झाल्यामुळे संबधित तत्कालिन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व आस्थापना विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोषी धरता येणार नसून कार्यरत कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना आयुक्तांना दिल्या होत्या.

मात्र, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास महापालिकेचे कामकाज चालविण्यात व्यत्यय येईल व सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये अनियमितता झाली असली तरी ती अनियमितता इतर नगरपालिकाप्रमाणे नियमित करून घ्यावी, असा अहवाल आयुक्तांनी शासनाला पाठविला होता. या अहवालाच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्यानुसार सदर कर्मचाऱ्यांचा अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे.