जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । यंदा मान्सून सामान्य वेळेपेक्षा १२ ते १४ दिवस आधीच महाराष्ट्रात धडकला असून तो मुंबईपर्यंत पोहोचला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. दरम्यान मान्सूनचे आगमन झाल्यांमुळे आता शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. काही शेतकरी मान्सूनचा पहिला पाऊस पडताच पेरणीच्या कामाला सुरवात करत असतात. मात्र लागलीच पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

सध्या राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून यामुळे काही ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परंतु जिथे जास्त पाऊस झाला आहे. त्याठिकांच्या शेतकऱ्यांना थांबावं लागणार आहे. जोपर्यंत वापसा येत नाही; तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. जिथे जास्त पाऊस झाला आहे, तिथे वापसा आल्यावर पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. राज्यात १४० मिलिमीटर मान्सून पूर्व पाऊस झाला. त्यामुळे वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावं असा सल्ला कृषी विभागाने आज दिला आहे.
या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. तर मुंबईसह काही ठिकाणी मान्सून आज २६ मे रोजी दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे. मात्र २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील.
सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान ५ जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.