जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२५ । राज्यात मान्सूनने धमाकेदार एन्ट्री केली. तीन चार दिवस जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. मात्र मागच्या काही दिवसापासून मान्सून पाऊस रखडला आहे. दुसरीकडे उकाडा प्रचंड वाढला आहे. यामुळे शेतकरीच नाही तर सर्वसामान्याना सुद्धा पावसाची चातकासारखी प्रतिक्षा लागलेली आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यात पाच दिवसाचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार आज २७ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर जळगाव जिल्ह्यातही धोधो पाऊस कोसळणार आहे.

हवामान विभागाकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात १२ जूनपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार असून, या काळात धो-धो पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यासाठी हवामान विभागाकडून १२ ते १४ जूनदरम्यान जळगाव जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरात हवामान विभागाने १० वेळा यलो अर्लट दिला आहे. त्यापैकी ६ अंदाज खरे ठरले आहेत. जिल्ह्यात १२ जूनपासून पाऊस तर होणारच आहे. मात्र, त्यासोबतच ४० ते ५० किमी वेगाने येणाऱ्या वादळी वाऱ्यांचाही सामना आता करावा लागणार आहे. राज्यात मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रीय झाला आहे.
राज्यात या भागात पावसाचा इशारा?
हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजानुसार 11 ते 14 जून दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.या काळात 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला.