जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । राज्यभरात अवकाळीनंतर आता मान्सूनपूर्व पाऊस चांगलंच झोडपून काढत आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आजही अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. २४ आणि २५ मे कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.ताशी ६० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज अलर्ट?
आज कोकणामधील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात तीन दिवस येलो अलर्ट :
दरम्यान जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवसांपासून यलो अलर्ट कायम ठेवला असून, २५ मेपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.