जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने राज्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसाने उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. अशातच उत्तर महाराष्ट्रात २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी जाेरदार पाऊस हाेणार आहे.

तसेच हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार राजस्थान आणि गुजरातच्या उत्तर-पश्चिम काेपऱ्यातून बाहेर पडणारा मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असून तो दसऱ्याला म्हणजे ५ ऑक्टाेबरपर्यंत खान्देशातून दक्षिणेकडे मार्गक्रमण करेल. १, ३ ऑक्टाेबरपर्यंत मान्सून सातपुडा ओलांडून खान्देशात प्रवेश करेल. दसऱ्याला पुढील दाेन दिवस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जाेरदार पावसाचा अंदाज आहे.

आठवड्यात जाेर ओसरणार
परतीचा मान्सून खान्देशातून ५ ऑक्टाेबरपासून परत जाणार असला तरी २८ सप्टेंबरपासून पावसाचा जाेर काहीसा कमी हाेणार आहे. नवरात्राेत्सवात सुरूवातीचे दाेन दिवस पावसाचे असतील. नंतर ४ ऑक्टाेबरपर्यंत पावसाचा जाेर आेसरलेला असेल. ५ ते ७ ऑक्टाेबर राेजी उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जाेर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
अशी असेल स्थिती
२०-२१ सप्टेंबरला गुजरात,राजस्थानातून बाहेर पडणारा मान्सून ३० सप्टेंबरपर्यंत गुजरातच्या दक्षिण भागात पाेहाेचेल.मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून परतीचा प्रवास सुरू हाेईल. ३ ऑक्टाेबरपासून उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करताना पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून बाहेर पडेल.१० ऑक्टाेबरला मान्सून पश्चिम महाराष्ट्रातून दक्षिणेच्या प्रवासाला निघेल.
दरम्यान, मान्सून परतीच्या नंतरही डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची अधूनमधून हजेरी राहणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून राज्याबाहेर जाईल. त्यानंतर अवकाळी, वादळी पाऊस काेसळेल. शेतीसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरण्याची दाट शक्यता आहे.










