⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

धरण, तलाव फिरायला, ट्रेकिंग करायला जाताय तर मग हे वाचा

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ ।गेल्या दोन आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणे, तलाव भरून ओसंडून वाहत आहेत. अश्या ठिकाणी नागरिकांना आनंद लुटायला सहज आवडते. परंतु, आनंदाच्या नादात नको ती घटना घडते आणि अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव, धबधबे, डोंगरावरील धार्मिक स्थळे अशा विविध क्षेत्रात दुर्घटना टाळता याव्या, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी रोजी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचे आदेश दिले. धोकेदायक ठिकाणी तसेच धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. याबाबत गृह विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभागासह इतर विभागांना त्यांनी जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

जिल्ह्यातील पर्यटनासाठी धार्मिक स्थळे, गड किल्ले, डोंगरावरील मंदिरात दर्शनासाठी नागरिक जातात. धबधब्यांखाली अंघोळ करतात. तेथे डोहात पोहतात. धरण परिसरात पिकनिक व सहलीला जातात. नदीत अंघोळ करतात. तलाव परिसरात फिरतात. डोंगराळ भागात धोका पत्करून भटकंती करतात. शेवाळामुळे पाय घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिजोखीम पत्करून गड किल्ल्यांवर पुरेसी साधन-सामग्री नसल्याने उंच भागात अडकतात. वन्यजीवांना त्रास होईल असे वर्तन असते. पाेहताना पाण्यात बुडल्याच्या घटना घडतात. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यात येतात. त्यामुळे हा कायदा लागू करण्यात आला आहे.

धरणाच्या संरक्षण व पिचिंग भिंतीवरून चालणे, आरडाओरड करणे, अफवा पसरवण्याचे प्रकार घडतात. स्थानिक मार्गदर्शकाची मदत न घेतल्यामुळे धोका निर्माण होतो. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. यासाठी मान्सून कालावधीत अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीत दक्ष राहणे आवश्यक आहे. या कालावधीत नैसर्गिक व मानव निर्मित घटना घडल्यास त्या घटनेचा समावेश आपत्ती व्यवस्थापनात होतो. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्याचे घोषित केले आहे.