⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

आरोग्य विभागाचा ५ कोटींचा निधी वापर न झाल्याने गेला परत

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी आलेला ५ काेटी रुपये खर्च न केल्यामुळे हा निधी शासनाला परत गेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,  प्रशासनाने टेंडर प्रक्रियेसह तांत्रिक कामे वेळेत न केल्याने ७ आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी आलेला निधी शासनाला परत करण्याची नामुष्की ओढवली आहे. यावरून जिल्हा परिषेदेच्या स्थायी समिती सभेत चांगलाच गोंधळ उडाला होता.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा साेमवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  करण्यात आली हाेती. जिल्हा परिषदेला आरोग्य विभागासाठी मिळालेल्या ५ काेटी रुपयांच्या निधी वेळेत खर्च हाेऊ शकला नाही. या निधीतून ७ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम करणे अपेक्षित हाेते.

सदर जबाबदारी प्रशासनाची हाेती. जिल्हा परिषदेत टेंडर प्रक्रिया करण्यासाठी, कार्यारंभ आदेश देण्यासाठी मनुष्यबळ नाही. निधी वेळेत खर्च करण्याची आणि  तसे नियाेजन करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते; परंतु प्रशासनाकडून वेळेत कामे न झाल्याने हा निधी परत गेला. त्यामुळे जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

या वेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चाैधरी, सर्व विषय समित्यांचे सभापती, सदस्य नानाभाऊ महाजन, शशिकांत साळुंखे, रावसाहेब पाटील, मधुकर काटे, अमित देशमुख, पवन साेनवणे यांच्यासह अन्य सदस्य ऑनलाईन सहभागी झाले हाेते.