जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून ५ हजार ६५० क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

गेल्या अनेक दिवसापासून पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. परंतु गेल्या ३ ते ४ दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशसह विदर्भात होत असलेल्या पावसाने तापी नदीला व पूर्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रकल्प पाणीपातळी २०९.८०० मिटर आहे.
दरम्यान, हतनूर धरण परिसरात गेल्या २२ तासात २५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.







