⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मंत्रिपदाच्या लालसेपोटी गुलाबराव पाटलांनी बंडखोरी केली – संजय सावंत

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । शिवसेना पक्ष कोणालाही घाबरत नाही. शिवसेना इडीला, कोणाच्या धमकीला कशालाच घाबरत नाही. आज पर्यंत इतकं मोठं बंड शिवसेनेत कधीही झालं नव्हतं. मात्र बंडखोरांना इतकी मोठी आमिष कधीच दिली गेली नव्हती. विरोधी पक्षाचं इतकं मोठं बळ याआधी कोणत्याही पक्षाने एखाद्या बंडाला दिलं नसल्यामुळेच शिवसेनेत आज इतकं मोठं बंड झालं असल्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना आमदार खासदार यांचा पक्ष नाहीये शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर शिवसेनेचे आमदार खासदार निवडून येतात. यामुळे आता त्यांना त्यांच्या मतदारसंघात आम्ही जिंकू देणार आणि शिवसेना एकनिष्ठ आहे. शिवसेनेला शिवसैनिक एकत्र असताना काहीही चिंता करायची गरज नाही असेही यावेळी संजय सावंत म्हणाले.

इतके दिवस शिवसैनिकांना जे चाललंय ते खरं आहे की खोटं ? हे शिवसैनिकांना समजत नव्हतं. यामुळे त्यांना आपण कोणाची बाजू घ्यायची हे समजत नव्हत. मात्र आता शिवसैनिकांना माहिती आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि जे पळून गेले ते ते गद्दार आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्रात यांच्या विरुद्ध शिवसेना पेटून उठणार आहे.

यावेळी ते असेही म्हणाले की, या गुलाबराव पाटलांना आजपर्यंत शिवसेनेने मोठा केलं. तेच आता गद्दार निघाले आहेत. मंत्रिपदाच्या लालसेपोटी ते आता बंडखोर झाले आहेत. गद्दार एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला लागले आहेत. या गुलाबराव पाटील यांना शिवसेना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.