⁠ 
शनिवार, मे 4, 2024

अर्थ खातं अजित पवारांकडे असलं तरी.. ; गुलाबराव पाटलांच्या विधानाने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२३ । राज्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील मंत्र्यांना खाते वाटप झाले असून सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे शिंदे गटाच्या प्रचंड विरोधानंतरही अखेर अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडेच गेलं आहे. गेल्या महाविकास आघाडीत अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं त्यावेळीस शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांना अत्यंत कमी निधी दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती या सरकारमध्ये होऊ शकते, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे. मात्र याच दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

अजित पवार यांना अर्थखातं दिल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं आहे.अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं तरी आता मागच्या काळासारखं होणार नाही. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल मुख्यमंत्रीच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नजरेखालून जाणार असल्याचं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं.

मागच्या काळात जे असंतुलित काम झालं होतं, ते या काळात होणार नाही. त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते, ते कामाच्या रूपाने बाहेर येतील. हा निर्णय योग्य असल्याचं सांगत अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आल्याचं समर्थनही गुलाबराव पाटील यांनी केलं. म्हणजे अजितदादांनी मंजूर केलेली फाईल दोन चाळणीतून जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे अजित पवार यांना मंत्रिमंडळात नगण्य स्थान आहे काय? अशी चर्चाही दबक्या आवाजात होऊ लागली आहे.अजित पवार हे मातब्बर नेते असल्यामुळे त्यांना सन्मानाचं खातं देणं गरजेचं होतं, असं मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय.