⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

भुसावळात 2 एप्रिलला भव्य करिअर, व्यवसाय व स्वयंरोजगार मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । आजच्या स्पर्धात्मक युगात सर्वानाच नोकरी मिळणे अशक्य आहे अश्या वेळी व्यवसाय सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते. पण नेमकं काय करावं? कुठलं क्षेत्र निवडावं हे मात्र निश्चित होत नाही. अनेक विद्यार्थी, पालक आणि व्यावसायिकांचा हा प्रश्न असतो. तरुणांनी व्यवसायाकडे वळावे, सरकारच्या विविध योजनांची त्यांना माहिती व्हावी, मार्गदर्शन व्हावे यासाठी तेजोदीप नवविचार फाउंडेशन व स्वावलंबी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ एप्रिल रोजी लोणारी समाज मंगल कार्यालय येथे भव्य उद्योग, व्यवसाय करिअर मार्गदर्शन सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजे दरम्यान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने २४ रोजी सायंकाळी लोणारी मंगल कार्यालय येथे तेजोदीप नवविचार फाउंडेशन व स्वावलंबी भारतच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या याबैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संधी, महिला स्वयंरोजगार, स्टार्टअप इंडिया, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, ऍग्रीकल्चर अँड गव्हर्मेंट स्कीम, स्वावलंबी भारत अभियान, उद्योग आणि सरकारी योजना, इनोव्हेशन्स अँड स्टार्टअप्स यावर मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राजेश नेहेते यांनी दिली. उद्योगासाठी भांडवल कसे उभे करता येईल, यासाठी सरकारी योजना, बँकांच्या योजना यावर विशेष माहिती दिली जाणार आहे, असे स्वावलंबी भारतचे जिल्हा समन्वयक संतोष मराठे म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटन भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे करतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून औ.वि.प्र.दीपनगरचे मुख्य अभियंता विवेक रोकडे असणार आहेत.

या कार्यक्रमात विद्यार्थी, तरुणांनी पालकांसह सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बैठकीत महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत पाटील, फाऊंडेशनचे सरचिटणीस वसंत कोलते, सहसरचिटणीस हेमंत भंगाळे, संयोजक योगेश कोलते, सदस्य ज्ञानदेव पाचपांडे, अरुण धांडे, वसंत भोगे, पंडित भिरूड, प्रा. धीरज पाटील, विश्वनाथ वारके, शिरीष जावळे, बाबुराव भंगाळे, निलेश वाणी, नितीन लोखंडे, जितेश वारके, भूषण वराडे, ललित नेहेते, चंद्रकांत पाटील, विनायक बेंडाळे, धर्मराज देवकर, राजेश भंगाळे, अरविंद कुरकुरे, सौ. वैशाली पाचपांडे, सौ. योगिनी नेहेते, निलेश कोलते, अमोल पाटील, प्रल्हाद नेहेते, किशोर बाक्से, दिलीप झांबरे, ज्ञानदेव वराडे, मुरलीधर लोखंडे, योगेश कोलते व असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

सूत्रसंचालन वसंत कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश वाणी यांनी केले.