⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार ; मंत्री महाजनांचा दाव्याने खळबळ..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२४ । आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असता विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. यामुळे भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मी यापूर्वीदेखील सांगितलं होतं की, राज्यातील राजकारणात अनेक भूकंप होतील.माझ्या संपर्कात काँग्रेसमधील अनेक नेते आहेत. त्यापैकीच अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला. ही वादळापूर्वीची शांतता आहे. लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील”, असं मोठं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे.

“शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. शिल्लक सेना आणि शरद पवार यांची शिल्लक राष्ट्रवादी, त्यांनी स्वतः कडे बघावं. आणखी काही नेते भाजपमध्ये येतील. जे आज टीका करत आहेत ते उद्या आमच्यात प्रवेश करतील. मी सर्वांची नावे घेत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींची रॅली जशीजशी मुंबईत शिवाजी पार्क येथे येईल तसे अनेक धक्के त्यांना बसतील”, असा मोठा इशारा गिरीश महाजन यांनी दिला.