⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच धक्का, माजी नगरसेविकेचा ठाकरे गटात प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२२ । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केली. तेव्हापासून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. मात्र यावेळी आता शिंदे गटाला धक्का बसला आहे. तो ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच. ठाण्यातील माजी नगरसेविकेने ठाकरे गटात घरवापसी केली. रागिणी वेरिशेट्टी यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी भास्कर वेरिशेट्टी, साहिल वेरिशेट्टी आदींनीही शिवबंधन बांधून शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचे वचन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे याना दिले . याप्रसंगी शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे , खासदार राजन विचारे , जिल्हाप्रमुख केदार दिघे , ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा , ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख , ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर , ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर आणि असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच पहिला हादरा बसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी नगरसेवकांना ठाकरे गटात परतीचे वेध लागल्याचं दिसत आहे. याशिवाय आणखी काही नेते-पदाधिकारी यांची घरवापसी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

याआधी जुलै महिन्यात ठाणे महानगरपालिकेतील ६६ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला होता. या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला होता.