⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आधी पाच कोटींचा हिशेब द्या मगच ९ कोटी रुपयांचा निधी देणार : आयुक्त विद्या गायकवाडांची तंबी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । ४२ कोटी रुपयांच्या निधीतून ४९ रस्त्यांची कामे मंजुर झाली असून ही कामे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत. या कामांसाठी मनपाने ५ कोटी रुपये दिल्यानंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व मक्तेदाराकडून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे आधी पाच कोटी रुपयांच्या निधीतून कोणती कामे केली त्याचा हिशोब द्या त्यानंतरच ९ कोटी रुपयांचा निधी देणार, अशी तंबी मनपा आयुक्तांनी सा. बां. विभागाला दिली आहे.

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्यशासनाकडून १०० कोटी रुपये मंजुर करण्यात आले असून या निधीतून १५० रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४२ कोटी रुपयांच्या निधीमधून ४९ रस्ते केली जाणार आहेत. त्यासाठी २ वर्षापुर्वीच शासनाने प्रशासकीय आहे.

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व मक्तेदार हे कोणते ना कोणते कारण सांगून काम करण्यास टाळाटाळ करीत होते. आधी निधी द्या त्यानंतर काम सुरु होईल असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे महापालिकेने मे महिन्यात ५ कोटी रुपये सां. बा. विभागाला वर्ग केले होते. परंतु मे महिन्यापासून ते आतापर्यंत सहा महिन्यात सां.बा. विभागाने एकही रस्त्याचे काम पुर्ण केलेले नाही, पाच कोटी रुपयांमध्ये शहरातील ५ प्रमुख रस्त्यांचे काम करणे अपेक्षित असतांना सां.बा.विभागाने काम केलेले नाही, त्यामुळे आधी ५ कोटीत केलेल्या कामांचा हिशोब द्या, त्यानंतर शासनाकडून आलेल्या ९ कोटी रुपयांचा निधी वर्ग करू असा इशारा मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिला