⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

ज्ञानेश्वर तवर प्रकरणातील आरोपीविरुद्ध 302 चा गुन्हा दाखल करा

जामनेर तालुक्यातील वाकडी येथे डोहरी तांडा येथील ज्ञानेश्वर प्रताप तवर या युवकाला जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या दहा दिवसांपूर्वी घडली. मात्र, संबंधित आरोपीवर कारवाई झाली नसून ती तात्काळ करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन जामनेर तालुका बंजारा समाजातर्फे तहसीलदार प्रशांत निंबाळकर व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना देण्यात आले.

यावेळी डॉक्टर ऐश्वर्या राठोड, प्रियंका सिंग, रमेश नाईक, निलेश चव्हाण, रामकिसन नाईक, चव्हाण राजेश चव्हाण, मुलचंद नाईक, दीपक चव्हाण, विकास तवर, एडवोकेट भरत पवार दरबार राठोड, नितीन नाईक, विजय तवर, सुमित चव्हाण, किशोर नाईक, डोंगर सिंग नाईक, आधी बंजारा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सविस्तर असे की, दिनांक 17 मे रोजी ज्ञानेश्वर प्रताप तवर हा विवाहित युवक त्याच्या पत्नीला घेण्यासाठी घाणेगाव तांडा कडे जात असताना वाकडी गावामध्ये ज्ञानेश्वर प्रताप तवर याचा गाडी समोर कुत्रा आल्यामुळे दुचाकी वाहन सुटला व वाकडी येथील महिलेला त्याच्या गाडीचा धक्का लागला. त्याचा राग आल्याने सदर महिलेच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वर प्रताप तवर याला बेदम मारहाण केली. त्यामुळे दिनांक 18 रोजी ज्ञानेश्वर तवर याचा मृत्यू झाला.

याबाबत पहूर पोलिसात सदर मयताच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वर तवर यास मारहाण करून मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या वाकडी येथील आरोपींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली. याउलट पहूर पोलिसांनी नातेवाईक सदर प्रकरणाची चौकशी ची माहिती घेण्यासाठी गेले त्यांनाच दबंगगिरी करून मारहाण केली असून हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालला आहे त्यामुळे सदर ज्ञानेश्वर प्रताप तवर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वाकडी येथील आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर मयताच्या नातेवाईकांना मारहाण करणाऱ्या पहूर पोलिस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे ही कारवाई झाली नाही तर संपूर्ण बंजारा समाज राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.