जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या महिन्यात तुरीच्या दरात वाढ दिसून आली. महिन्याभरापासून तुरीचे दर ७,८०० ते ८,२०० रुपये प्रति क्विंटल स्थिर होते, मात्र गेल्या आठवडाभरात जळगाव बाजार समितीत तुरीच्या भावात जोरदार चढ-उतार दिसून येत आहेत. ११ फेब्रुवारी रोजी तुरीचा दर प्रति क्विंटल ८,०८० रुपये होता, तर १८ फेब्रुवारीपर्यंत तो ७,००० रुपयांपर्यंत घसरला.

जानेवारी महिन्यात तुरीची आवक फार काही जास्त नव्हती, आवक कमी झाल्यामुळे दरात काहीशी वाढ झाली होती. मात्र, आता नवीन तूर बाजारात येऊ लागल्याने आता तुरीच्या दरात चढ-उतार होत आहेत. यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात तुरीचे दर वाढतील, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यात तुरीचे दर ८,२०० रुपयांवरून घटत घटत ७,५००, नंतर ७,८०० आणि आत ७,००० रुपयांवर आले. या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे, विशेषत: खरीप हंगामात आधीच फटका बसलेला आहे.








