⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर – अनिल जैन

जळगाव लाईव्ह न्युज | ५ जून २०२२ | ‘शेतीकडे नवीन पिढी वळत नाहीय त्यामुळे गावाकडून शहराकडे स्थलांतर वाढत आहे. देशाचे भविष्य असलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांमध्ये मॉडर्न एग्रीकल्चर संस्कृती रूजावी, जेणे करून शेतीत अत्याधुनिक साधनांचा वापर करून आर्थिक सुबत्ता येईल. यासाठी फालीमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, इंटरशिप आणि व्यवसायासाठी आवश्यक ते प्रोत्साहन दिले जाईल असे सांगत भविष्यात फालीमधील विद्यार्थी एग्रीकल्चरचे नवे मॉडेल उभे करित असा विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.


फाली संम्मेलनाच्या समारोपाप्रसंगी अनिल जैन बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोदरेज अॅग्रोव्हेटचे संचालक बुर्जीस गोदरेज, स्टार एग्रीचे संचालक अमित अग्रवाल, फालीच्या संचालिका नॅन्सी बेरी, जैन फार्मफ्रेश फूड्सचे संचालक अथांग जैन व परिक्षक मान्यवर उपस्थित होते.


अनिल जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, चांगल्या काळात आणि आव्हानांच्या काळात सगळयात महत्वाची गोष्ट अशी तुमचे लक्ष तुमच्या उद्दिष्टावर असायला हवे. फाली आणि कृषी व्यवसाय यातील नेते म्हणून भावी जीवनात आणि भविष्यात याचा उपयोग होईल. तुम्ही आव्हानांच्या काळात असतांना तुम्ही जे काम कराल त्यात खूप सुधारणा करा. ‘कृषी तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय यात लोकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. जैनचे सहकारी एकत्र काम करण्यावर विश्वास ठेवतात आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा वापर करतात. जैन सहकाऱ्यांच्या सतत प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप सकारात्मक बदल होतो.’ भविष्यातील फाली नायक उपक्रमात आधुनिक कृषी क्षेत्रीतील तंत्र, तुमच्या गावासाठी नेतृत्व करण्याच्या व सकारात्मक बदल घडवण्याच्या क्षमतेवर खूप विश्वास आहे.


फालीचे विद्यार्थ्यांचे सादरकीरण प्रभावशाली – बुर्जीस गोदरेज
आधुनिक शेती शाश्वत बनवण्यासाठी तुम्ही फालीचे विद्यार्थी उत्साही आणि जिद्दी आहेत. जगातील सर्व लोकांसाठी अन्नधान्य पिकवणे हे आवश्यक आहे. भारतीय कृषीक्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे असे फालीच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहिल्यानंतर वाटते यातुन उद्योजकाची वाट धरली जाते. आधुनिक शेती करण्यासाठी प्रेरणा मिळते. नवीन व्यवसाय करा किंवा जे काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या. माझा तुम्हाला हा सगळयात महत्त्वाचा सल्ला आहे. जे लोक तुमचा दृष्टीकोन समजतील आणि अतिशय वचनबद्ध, गुणवंत असतील अशा लोकांना तुम्ही तुमच्या अवतीभवती कायम स्थान द्यावे.
समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी फालीच्या कॅप्स उडवून सहभागाचा आनंद व्यक्त केला. नावीन्यपूर्ण शेती उपकरण व व्यवसाय योजनामधील सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पदक देऊन गौरविण्यात आले. यासह प्रायोजक कंपन्यांच्या प्रतिनिधीचा फालीच्या संचालिका नॅन्सी बेरी यांच्याहस्ते सूतीहार देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी संवाद साधला. सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाडगे यांनी केले.