जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.राज्य परीक्षा मंडळाने बारावी परीक्षेच्या अर्जाची मुदत वाढविली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची उद्या दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी शेवटची मुदत आहे. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.












