⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शहरातील रस्ते घेणार मोकळा श्वास, अतिक्रमण झाल्यास मनपा अभियंत्याला जबाबदार धरणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोठे अतिक्रमण झाले असून तो प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आली आहे. अतिक्रमणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. रस्त्यांचे सर्वेक्षण करून माेजणी हाेईल. भविष्यात रस्त्यावर अतिक्रमण झाल्यास अभियंत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मनपा विकास आराखड्यानुसार शहरातील रस्त्यांची स्थिती नकाशावर चांगली असली तरी प्रत्यक्षात विपरीत चित्र पाहायला मिळते. शहरातील अनेक रस्ते हे विस्तीर्ण असले तरी त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे एखाद्या लहान गल्लीप्रमाणे त्याचे स्वरूप झालेले आहे. शहरातून सहा प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग जातात. या मार्गावर अतिक्रमणाचा प्रश्न काही दिवसांपासून गाजत असून सर्वच रस्ते अतिक्रमण विरहित करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून लवकरच आदेश काढला जाणार आहे. यात ज्या प्रभागातून रस्ता जात असेल त्या प्रभागातील अभियंत्यांवर त्याची जबाबदारी साेपवली जाणार आहे.

पीडब्ल्यूडीच्या मालकीचे सहा रस्ते अद्याप हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. पालिकेला या रस्त्यांवर खर्च करणे अशक्य आहे. परंतु रस्त्यांची हस्तांतरण प्रक्रिया करण्यापूर्वी महापालिकेला अतिक्रमण काढून रस्ते माेकळे करावे लागणार आहेत. शहरातील बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून राजकीय हस्तक्षेपाने अनेक अतिक्रमणाकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याची ओरड नेहमी होत असते. रस्त्यांचे  सर्वेक्षण केले जाणार असून विकास आराखड्यानुसार रस्त्याच्या दाेन्ही बाजूने अतिक्रमणांची माेजणी हाेईल. अतिक्रमणांनी व्यापलेले रस्ते माेकळे करण्यासाठी नगररचना विभागाच्या रचना सहायकांसह प्रभागातील अभियंत्यांवर विशेष जबाबदारी असेल.