⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

अतिक्रमण भोवले, नगरदेवळा उपसरपंच अपात्र

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । नगरदेवळा ( ता. पाचोरा )  येथील उपसरपंच विलास राजाराम पाटील ( भामरे ) यांनी, शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कायम ठेवत त्यांना अपात्र ठरवले.

सविस्तर असे की, विलास पाटील यांनी प्रभाग क्रं. २ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्याविरुद्ध दीपक परदेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ११४ (ज-३) अन्वये, शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यात दिलेल्या सर्व पुराव्यांची तपासणी करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २२ जूनला त्यांना अपात्र घोषित केले होते. त्या निकालाविरोधात विलास पाटील यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केले होते. त्यावर विभागीय आयुक्तांनी पडताळणी केली. पाटील हे शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याचे सिद्ध झाल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आपात्रतेची कारवाई योग्य व कायदेशीर आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. विलास पाटील यांनी बचावासाठी केलेले अपिल आयुक्तांनी फेटाळले, तसेच अपात्रतेचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे नगरदेवळा गावात खळबळ उडाली असून, इतर अतिक्रमणधारकांचेही धाबे दणाणले आहे. तक्रारदारतर्फे पाचोरा येथील ऍड. प्रल्हाद पाटील यांनी कामकाज पाहिले.

धरणगावात मूक मोर्चालापोलिस परवानगी नाकारली

धरणगाव येथील गायरानसाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी गायरान बचाव मंचतर्फे पशुधन पालक, शेतकऱ्यांसोबत १७ रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या उद्देशाने धरणगाव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. मोर्चामुळे तेढ निर्माण होवून शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने धरणगाव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. अर्जदारांना सनदशीर मार्गाने त्यांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाने दिले आहेत.