⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

खासगी रुग्णालयांनी नाकारलेल्या अत्यवस्थ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले

जळगाव लाईव्ह न्यूज | 21 जून 2023 | अनेकवेळा रुग्णाची परिस्थिती अत्यंत बिकट होते तेंव्हा अनेक खासगी रुग्णालये त्या पेशंटला भरती करुन घेत नाही, अनेकवेळा सिव्हिल हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला जातो मात्र कधी कधी सिव्हिल हॉस्पिटलमध्येही काही मर्यादा येतात, अशावेळी अत्यवस्थ अवस्थेत छत्रपती संभाजीनगर किंवा थेट मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला जातो. अशी परिस्थिती जेंव्हा निर्माण होते तेंव्हा रुग्ण व त्याचे नातेवाईक आधीच धास्तावलेले असतात. मात्र अशा संकटसमयी अत्यावस्थ रुग्णांसाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागाने केलेले कार्य खूपच महत्वपूर्ण ठरत आहे. याबाबतीत डॉ. उल्हास पाटील यांच्याशी साधलेले संवाद…

डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, अतिदक्षता विभागाला इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) म्हणून देखील ओळखले जाते. हे रुग्णालयातील सर्वात महत्वाचा भाग म्हणून देखील ओळखले जातो. अतिदक्षता विभागामध्ये गंभीर रुग्णाची काळजी घेणारी यंत्रणा तसेच जीवघेणा आजार आणि दुखापतग्रस्त रुग्णांची पूर्तता करणारी उपकरणे आहेत. ज्या रुग्णांची सतत शारीरिक देखभाल करणे आवश्यक असते, सामान्य शारीरिक कार्ये सुनिश्चित करण्यासाठी जीवन समर्थन उपकरणे आणि औषधोपचारांवर देखरेखीची आवश्यकता असते अशा रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जातात. अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांसह कार्यरत असणार्‍या परिचारिकांकडे विशेष कौशल्ये असणे आवश्यक असते. यामुळे रुग्णालयातील सर्व परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागात रुग्ण आल्याबरोबरच तत्काळ सेवा देण्यासाठी येथे २४ तास आयसीयू तज्ञांची टीम तैनात असून आतापावेतो अनेक रुग्णांना येथून जीवनदान मिळाले आहे. मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात प्रत्येक बेडच्या बाजूलाच व्हेंटीलेटर, ऑक्सीजन पाईपची व्यवस्था आहे, याशिवाय अत्यावश्यक औषध साठाही येथे असतो. याशिवाय प्रत्येक रुग्ण हा सीसीटीव्हीसह २४ तास तज्ञांच्या देखरेखीखाली असतो यामुळे रुग्णाच्या बारीक बारीक हालचालीनुसार उपचार पद्धतीत बदल केले जातात.

रुग्णालयाचा संपूर्ण परिसरच स्वच्छ असून विशेषत: अतिदक्षता विभाग हा वारंवार स्वच्छ केला जातो, येथे विविध आजाराचे रुग्ण असून जंतुसंसर्ग होवू नये यासाठी नियमानुसार निर्जंतुकीकरणावरही भर दिला जातो. येथे मेडिसीन तज्ञ डॉ.चंद्रेय्या कांते, डॉ.पूजा तन्नीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी डॉक्टर तसेच प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफही येथे आहे. डॉक्टरांचा राऊंड झाल्यावर डॉक्टर रुग्णांच्या परिस्थिती सांगून समुपदेशनही करतात, याशिवाय नातेवाईकही आपल्या शंका, प्रश्न विचारून निरसन करुन घेत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.

रुग्णालयात सर्वच शासकीय योजना उपलब्ध आहे. ज्यात महात्मा ज्योतिबा फुले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, इएसआयसी, कॅशलेसचा रुग्णांना लाभ दिला जातो. या सर्व योजनांसाठी रुग्णांकडून डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलला पसंती मिळते, याचे कारण रुग्णालयात आल्यावर रुग्णांना अन्य तपासण्या, रेडिओलॉजी चाचण्यांसाठी बाहेर जाण्याची गरज भासत नाही. रुग्णालयात एकाच छताखाली प्रयोगशाळा, अतिदक्षता विभाग, स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला, सात्विक भोजन दिले जाते. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांचा वेळ, श्रम व पैशाची बचत होते.

सर्वच अतिगंभीर, गंभीर आणि साधारण स्वरुपाच्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात. खाजगी रुग्णालय, सिव्हील हॉस्पिटल येथून गुंतागुंतीच्या व अत्यावस्थेत आलेल्या रुग्णांना येथे दाखल करुन घेतले जाते. याशिवाय ट्रॉमा, विषबाधा, हाणामारीत जखमी झालेले रुग्ण, चाकूहल्ला अशा सर्वच घटनेतील जखमींवर येथे गोल्डन अवर्समध्ये उपचार केले जात असल्याचे डॉ.उल्हास पाटील यांनी नमुद केले.