⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

शिंदे सरकार देणार विजेच्या दरवाढीचा झटका ; तब्बल ‘इतके’ टक्के वाढ होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार (shinde government) स्थापन झाले आहे. दरम्यान, महागाईने होरपळून निघणाऱ्या राज्यातील जनतेला शिंदे सरकारकडून काहीसा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा केली जात होती. मात्र सरकार स्थापनेच्या दुसऱ्या आठवड्यात शिंदे सरकार महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना विजेचा धक्का देणार आहे. शिंदे सरकारने विजेच्या दरात वाढ (Electricity bill) करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीला मंजुरीही देण्यात आली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे गटाच्या सरकारने घेतला असून या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा वीज बिलाच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. तसंच कोणतीही दर आकारण्यात आले नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र वीज नियंत्रण मंडळाने सांगतले आहे. या निर्णयामुळे मुंबईतील बेस्ट वीजच्या 10.5 लाख, 7 लाख टाटा पॉवर, 29 लाख अदानी इलेक्ट्रिसिटी आणि एमएसईडीसीएलच्या 2.8 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे. दरम्यान, विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ झाल्यास याचा फटका घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक परिसरातील वीज ग्राहकांवर होणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना काळात भरमासाठ वीज बिल आल्यानंतर भाजपने राज्यभरात आंदोलनं केली होती. वीज दरवाढीला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपने जोरदार आंदोलनं केली होती. कोळसा साठ्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर भाजपने मविआ सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता सत्तेत आल्यानंतर काहीच दिवसांमध्ये शिंदे सरकारने वीज दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.