⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नागपूरच्या पराभवानंतर एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा, म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ फेब्रुवारी २०२३ | नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधान परिषद निवडणुकीत ५ पैकी केवळ कोकणातील एका जागेवर भाजपाची विजयी पताका फडकली. विशेष म्हणजे, भाजप व आरएसएसचा गड मानल्या जाणार्‍या व केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमपीच असणार्‍या नागपूरातही भाजपाचा पराभव झाला आहे. यावरुन पूर्वश्रमीचे भाजप नेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. खडसेंनी नागपूरच्या पराभवाला फडणवीसांना जबाबदार धरलं आहे.

स्वत:च्या गावात खडसे सरपंच निवडून आणू शकत नाही, असं मला म्हणणार्‍या फडणवीस यांना माझा सवाल आहे. आता, नागपूरचा आमदार तरी निवडून आणून दाखवा, असे चॅलेंज देतांना,
कुछ नही अभी भाजप मे
दुसरे लोक चुनके आ रहे है,
उनके गाव मे …

अशी शायरी करत खडसेंनी भाजपवर निशाणा साधला. यापुढे चित्र महाविकास आघाडीचेच आहे, असे म्हणत महाविकास आघाडीला भविष्यात मोठं यश मिळणार असल्याचंही खडसेंनी म्हटलं.

नोकरदार शिक्षक वर्ग म्हणतो पूर्वीचे पेन्शन पाहिजे. त्यावेळी, आपले फडणवीस साहेब म्हणत होते, विरोधी पक्षात दम नाही. आम्ही पेन्शन देऊ असं देवेंद्रजींनी निवडणुकीत सांगितलं. पण, जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणूनच, नागपूरची जागा मुद्दामून मतदारांनी पाडली, असे खडसे म्हणाले. खडसेंच्या या टीकेला आता भाजपा काय प्रतिउत्तर देते? याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागून आहे.