⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

नाथाभाऊंनी केली पहिल्यांदाच अजित पवारांवर जोरदार टीका ; काय म्हणाले वाचा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२४ । राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. यावेळी त्यांनी रोहित पवार यांना आलेल्या ईडीच्या समन्सवरही भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले खडसे?
शरद पवार यांनी अजित पवार यांना राजकारणात आणलं. त्यांना आयुष्यभर राजकारण शिकवलं, वरच्या पदापर्यंत नेलं, बोट धरून राजकारणातले डावपेच शिकवले. तेच अजित पवार शरद पवार यांना सोडून गेले. अशा अजित पवार यांच्यासाठी धोकेबाज हा शब्दच बरोबर आहे. यापेक्षा दुसंर काय वेगळं ट्विटरवर बोलणार? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.

रोहित पवार यांना ईडी समन्स येणे अपेक्षित होतं. बारामती ॲग्रोवनवर ज्या दिवशी रेड पडली, त्याच दिवशी हे राजकीय षडयंत्र होणार असल्याचे लक्षात आलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना नामोहरण करण्यासाठी अशा पद्धतीने कारवाई केली जात आहे. अशाच पद्धतीने राजन साळवी यांच्यावरही कारवाई झाली. भाजप ईडीचा, इन्कम टॅक्सचा वापर करून देशात दहशतीचे वातावरण तयार करत आहे. तुम्ही आमच्या विरुद्ध बोलला तर तुमच्या विरुद्ध आम्ही एक शस्त्र उगारू अशा पद्धतीने हे षडयंत्र केलं जातं आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

दरम्यान, सध्या विरोधकांवर होत असलेल्या ईडी कारवाईवरून देखील खडसे कडाडले. विरोधकांवरच कारवाई केली जात असून अनियमितता ही फक्त विरोधकांच्या संस्थांमध्येच आहे का? सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदारावर, एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का होत नाही. अजितदादा असतील किंवा त्यांच्यासहीत इतर असतील, जे भाजपमध्ये जातात ते स्वच्छ होतात. असं भाजपकडे वॉशिंग मशीन आहे. त्यात या आणि स्वच्छ होऊन बाहेर पडा अशी ही मशीन आहे, असा चिमटा त्यांनी काढला.