⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

..तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरायचे ; नाथाभाऊंची जोरदार टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार टीका केलीय. भाजप शिवसेनेची (Shiv Sena) युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही टीका केली. ज्यांना हे कालपर्यंत भ्रष्ट म्हणत होते, नॅशनल करप्ट पार्टी म्हणून म्हणत होते, आज गिरीश महाजन यांचे नेते त्यांच्यासोबत खुर्चीला खुर्ची लावून बसतात. त्यामुळे आता कुठे नैतिकता राहिली आहे, असंही ते म्हणाले. Eknath Khadse criticism of Girish Mahajan

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकी घेतली यावेळी शिवसेना-भाजपची युती उद्धव ठाकरे यांनीच तोडली होती, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं होते. सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून ते गिरीश महाजनांपर्यंत सर्वांनीच समर्थन केलं आहे. मोदी यांनी दिलेली माहिती बरोबर असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र, खडसे यांनी या नेत्यांचं म्हणणं खोडून काढलं आहे.

तसेच यावेळी गिरीश महाजनांवर टोला लगावला आहे. भाजप – शिवसेनेची युती तुटली त्यावेळेस गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते. त्यावेळी गिरीश महाजन यांचा कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हते. त्या कालखंडातील दिल्लीच्या कोर कमिटीच्या बैठकीला महाजन यांना बोलावल्या जात नव्हतं. त्यावेळी भाजपची सूत्र मी विरोधी पक्षनेते असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. त्यामुळे मधल्या कोणत्याच गोष्टी महाजन यांना माहिती नव्हत्या, असं सांगतानाच कमीत कमी माहिती घेऊन त्यांनी बोलायला हवं, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची मतेही खोडून काढली. सुधीर मुनगंटीवार यांना अर्धवट माहिती आहे. शिवसेनेने जागा वाढवून द्या अशी मागणी केलेलीच नव्हती. कारण शिवसेनेकडे 171 जागा होत्या. भाजपाच्या 117 जागा होत्या. त्यावेळी वातावरण आपल्या बाजूला आहे, असं भाजपला वाटलं. त्यामुळे युतीत जागा वाटपाची चर्चा करताना भाजपने 145 जागांची मागणी केली. थेट 117 वरून 145 जागांची मागणी केली होती. पण काही जागा देण्यास शिवसेनेने विरोध केला होता.