⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

जर सत्ताधार्‍यांमध्ये दम असेल तर..; तो आरोप फेटाळून लावत खडसेंचं प्रतिआव्हान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२३ । ना. गिरीश महाजन (Girish Mahajan), ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व ना. अनिल पाटील (Anil Patil) या तिन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल सोमवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली असून याप्रसंगी अनुपस्थित असलेले आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्यावर एका मोठा आरोप करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विकासकामे थांबविण्यासाठी खडसेंकडून अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी केला असून यावरून आमदार खडसे यांचा निषेधाचा प्रस्ताव देखील याप्रसंगी मांडण्यात आला. दरम्यान, आता एकनाथ खडसे यांनी हे आरोप फेटाळून लावत सत्ताधार्‍यांवर प्रत्यारोप केले.

नेमकं काय म्हणाले खडसे?

सत्ताधारी मंत्री आणि आमदार हे माझ्यावर एक हजार कोटींच्या कामांना ब्रेक लावण्याचा आरोप करत असले तरी त्यांनी आधी कंत्राटदारांचे तीनशे कोटी रूपये आणून दाखवावेत. सार्वजनीक बांधकाम खात्याच्या ठेकेदारांची ३०० कोटींची बिले थकीत असून ही देयके मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. जर सत्ताधार्‍यांमध्ये दम असेल तर त्यांनी आधी हे ३०० कोटी आणावेत मगच आपल्यावर आरोप करावेत असे प्रतिआव्हान एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे ना खाऊंगा, ना खाने दुंगा असे म्हणत असतांना त्यांच्याच पक्षाचे लोक भ्रष्टाचाराला पाठीशी का घालत आहेत ? असा प्रश्‍न देखील एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला आहे. काहीही झाले तरी गैरकामे आपण होऊ देणार नाहीत. सरकार तुमचेच आहे. तुमची पत असेल तर आधी ठेकेदारांचे ३०० कोटी रूपये द्या असे आव्हान त्यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री आणि आमदारांना दिले आहे. तर तिन्ही मंत्र्यांची शासन दरबारी काहीही किंमत नसल्याचा टोला देखील त्यांनी मारला आहे.

खडसेंवर आरोप काय?
आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांनी विधीमंडळ अधिवेशनात सार्वजनीक बांधकाम खात्याबाबत लक्षवेधी उपस्थित केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार कोटी रूपयांची कामे रखडल्याचा आरोप केला. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी याला दुजोरा दिला. खडसे हे अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करत असून त्यांच्यामुळेच एक हजार कोटींचा निधी आणि त्यातून होणारी रस्त्यांची कामे थांबल्याचा आरोप देखील मंगेश चव्हाण यांनी केला.