⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

‘एक देश एक खत’ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, खा. रक्षा खडसेंनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेली ‘एक देश एक खत’ ( प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना ) ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. या योजनेमुळे खत टंचाई होणार नाही त्याचबरोबर किफायतशीर दरात खते उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचतही होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताची आणखी एक योजना सुरु केल्याबद्दल खासदार रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.

खा. रक्षा खडसे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , एक देश एक खत योजनेमुळे सर्व खते एकाच म्हणजे भारत ब्रँड या नावाने बाजारात उपलब्ध होतील. भारत युरिया, भारत डीएपी, भारत एनपीके या नावाने बाजारात खतांची विक्री होईल. एकाच ब्रँडची विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ होणार नाही तसेच खते रास्त दरात उपलब्ध होतील.
आपल्या उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी कंपन्या अनेक युक्त्या करीत असतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. सर्वाधिक मागणीच्या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचे प्रकारही घडतात. एक देश, एक खत या योजनेमुळे खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होईल. त्याचबरोबर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळया कंपन्यांच्या खतांमधील घटक पदार्थांचे प्रमाण समान राहणार आहे. डीएपी खताचे उत्पादन वेगवेगळ्या कंपन्यांनी केले तरी त्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण अनुक्रमे १८ आणि ४६ टक्केच असले पाहिजे, असा नियम करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, असेही खारक्षाताई खडसे यांनी पत्रकात म्हटले आहे.की मोदी सरकारने सुरु केलेल्या किसान समृद्धी केंद्रांमुळे शेतकऱ्यांना वेगवेगळया सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या केंद्रांमध्ये खते , बियाणे, औषधांची, अवजारे यांची विक्री होईलच त्याचबरोबर माती , बियाणे आणि खतांचे परीक्षणही होणार आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.