जळगाव लाईव्ह न्यूज । आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा जाणवत असताना इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे अनेक सागरी मार्गांवर निर्बंध आले असून काही ठिकाणी आयात-निर्यात व्यवहारही ठप्प झाले आहेत.याचा थेट परिणाम भारतातील अंड्यांच्या बाजारपेठेवर झाला असून अंड्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

आखाती देशांकडे होणारी अंड्यांची निर्यात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारात अंड्यांचा साठा वाढला आहे. परिणामी, घाऊक बाजारात अंड्यांच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी ७ रुपयांना मिळणारे एक अंडे आता घाऊक बाजारात ५ रुपयांपर्यंत घसरले आहे. म्हणजेच अंड्यांच्या दरात सुमारे २ रुपयांची घट झाली आहे.

निर्यात ठप्प झाल्यामुळे उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात अंड्यांचा साठा अडकून पडला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना देशांतर्गत बाजारातच अंडी विकावी लागत असल्याने दर खाली आले आहेत. याचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत असून किरकोळ बाजारातही अंड्यांचे दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, इराण-इस्त्रायल संघर्षामुळे काही महत्त्वाचे सागरी मार्ग बंद झाल्याने आखाती देशांशी होणारा व्यापार प्रभावित झाला आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास अंड्यांच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे.







