जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही काळापासून महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला आता काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. दरम्यान यातच गृहिणींसाठी खुशखबर आहे. ती म्हणजेच डाळींच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसात तूरडाळीच्या दरात किलोमागे ४० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. तूरडाळीसह चणाडाळीच्या दरात १५ ते २० रुपये, तसेच उडीद डाळीच्या दरात पाच ते दहा रुपयांनी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान सध्या तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. २०२४ मध्ये एप्रिलपासून तुरीच्या दरात सुधारणा झाली होती. आठ ते नऊ हजार रूपये क्विंटलची तूर नोव्हेंबर महिन्यात १२ हजार रूपये क्विंटलपर्यंत पोहचली होती. मात्र डिसेंबर महिन्याच्या अखेरीपासून दरात घसरण दिसून येत आहे. १२००० हजार रुपायांवर असलेली तुरीचा दर आता ६५०० ते ७३०० रुपयापर्यंत पोहोचले आहे
तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. राज्यभरात १२ लाख हेक्टरपर्यंत तुरीची लागवड झाली. गतवर्षीपेक्षा यावर्षी तुरीचे लागवड क्षेत्र वाढले आहे. यंदाही दर चांगले मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र योग्य भावाअभावी उत्पादन खर्चही निघतो की नाही अशी चिंता व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात विदेशातून तूरडाळ आयात सुरू झाली. याचवेळी कर्नाटकातही तुरीचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम राज्यातील बाजारावर झाला आहे. दोन महिन्यांत तुरीचे दर क्विंटलमागे तब्बल चार हजारांनी घसरले आहेत.
दुसरीकडे डाळीचे दर घसरल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. बाजारात आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीच्या दरांत प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे.
नोव्हेंबर २०२४ फेब्रुवारी २०२५
तूरडाळ – १६५ ते १८० रुपये १०५ ते १२० रुपये
चणाडाळ – ८८ ते ९४ रुपये ७५ ते ८० रुपये
उडीद डाळ – ११५ ते १२० रुपये १०० ते ११० रुपये