जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तयाडे आणि बी.टेक. ॲग्री. जळगावचे प्राचार्य डॉ. पूनमचंद सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपप्राचार्य प्रा. प्रवीण देवरे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत आणि त्यांच्या कार्यामुळेच समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. करण बनसोडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित भाषणे व विचार व्यक्त केले. त्यांच्या भाषणातून डॉ. आंबेडकरांच्या कार्याबद्दलचा आदर आणि त्यांच्या विचारांची महती दिसून आली.
प्राचार्य डॉ. शैलेश तयाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे महत्त्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आत्मसात करून एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले. वातावरण उत्साहमय आणि प्रेरणादायी होते.