⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

संपूर्ण जळगाव शहराचा जिव्हाळ्याचा असणाऱ्या शिवाजी नगर पुलाचा रंजक इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. मात्र, जळगाव शहरातील नागरिकांना तारीख पे तारीख शिवाय काहीही ऐकायला किंवा पाहायला मिळत नाहीये. आत्ताची स्थिती पहिलीतर लवकरच हा पूल बनेल असा अंदाज आहे. आणि लवकरच हा पूल बनेल असा अंदाज आहे. मात्र या पुलाचा एक रंजक इतिहास आहे. ज्याची सुरुवात होते २००८ साली. जेव्हा या पुलाची मुदत संपली होती.

शिवाजी नगरच्या जुन्यापुलाचे काम १९०८ साली संपले आणि हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. तब्बल १०० वर्षांनी या पुलाची मुदत संपल्यानंतर पूल पाडण्यात यावा याबाबत २००८ मध्येच इंग्रजांचे पत्र आले होते. १०० वर्ष जुन्या पुलाची मुदत संपल्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर पुलाच्या कामाला मंजूरी आपल्या नेत्यांनी दिली. काम कोण करेल, मनपा, रेल्वे की सार्वजनिक बांधकाम विभाग ? यावरच अनेक महिने चर्चा झाली. त्यानंतर रेल्वेने आपल्या भागातील कामाची तयारी दाखवली, मात्र निधी नसल्याचे कारण देत मनपाने हात झटकले. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर करून दिला.आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग झाला. पुढे काम मंजूर झाल्यानंतर पूल ‘टी’ आकारात होईल ‘वाय’, की मग ‘एल‘, यावर तब्बल सहा महिने निर्णय रखडला. ‘टी’ आकारातील कामाला मंजुरी मिळाली असली तरी सुरुवातीला ‘एल’ आकारातील पुलाचे काम हाती घेण्यात आले. ५ फेब्रुवारी २०१९ ला कामाला ‘टी’ आकारानुसार कामाला सुरुवात झाली. कोरोना आला आणि टाळेबंदीची घोषणा झाली. कामावरील मजूर परतले, पुलाचे काम पुन्हा थांबले. पुढे रेल्वेने ६ महिन्यातच आपल्या हद्दीतील काम संपविले मात्र पुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्याचे काम कोण करेल ? हे ठरवण्यासाठी प्रचंड वेळ गेला.

कोणत्याही कामाला मोठ्या प्रशासकीय यंत्रणांच्या मंजुरीतून जावे लागत असते. प्रशासकीय यंत्रणा गतीमान झाल्यास कामे देखील जोरात होवू शकतात. मात्र, शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या संपुर्ण प्रक्रियेत प्रशासनाची मोठ्या प्रमाणात उदासिनता दिसून आली. पुलाची मुदत संपल्यापासून ते निधी मंजूरी, निविदा, कार्यादेश, पुलाचा आकार, विद्युत खांब हटविण्याचा कामासह मनपा, महावितरण, रेल्वे, विभागीय आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग असो वा जिल्हा प्रशासन या सर्व प्रशासकीय यंत्रणाचा ढिसाळपणा व उदासीनतेमुळेच इतके वर्ष हा पूल अजून होऊ शकला नाहीये.

अपयशी लोकप्रतिनिधी !

पुलाचे काम मंजूर झाल्यापासून जिल्ह्यात ६ नवीन पालकमंत्री आले. मात्र ते अजून हा पूल पूर्ण करू शकले नाहीत. शिवाजीनगर भागातील १२ नगरसेवक मनपात या भागातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात पण त्यांनी हा प्रश्न नीट मंडला नाही. शहराचे आमदार सुरेश भोळे हे २०१४ ते २०१९ पर्यंत सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. मात्र,पुलाच्या कामासाठी पाठपुरावा करण्यात ठरले सपशेल अपयशी ठरले. पुलाच्या मंजुरीपासून ते आतापर्यंत मनपाचे पाच महापौर बदलले मात्र पुलाचे काम झालेच नाही. मनपाचे ५ आयुक्त ५ जिल्हाधिकारी आले आणि गेले मात्र अजूनही पूल बनलेला नाही.

नागरिकांना फटका !

शिवाजीनगर, राजाराम नगर, केसी पार्क, दांडेकर, प्रजापत नगर, पवन नगर, गेंदालाल मील, लाकूड पेठ, इंद्रप्रस्थ नगर भागातील सुमारे ५० हजारहून अधिक नागरिक दररोज येजा करतात. जळगाव तालुक्यातील २५ गावांमधील नागरिकांना शहरात येण्यासाठीचा मार्ग अडीच वर्षांपासून आहे बंद. चोपडा व यावल तालुक्यांमध्ये दररोज च्या सुमारे बसेसच्या ३० फेऱ्या प्रभावित, खासगी वाहनांची संख्याही अमर्यादित आहे. जळगाव शहर, तालुक्यातील २५ गावांसह चोपडा, यावल तालुक्यासह सुमारे ५ लाख नागरिकांना पुलाचे काम रखडल्याने फटका बसला आहे.