⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पहाटच्या शपथविधीमागे शरद पवारच! फडणवीसांच्या दाव्याने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी एक सगळ्यात मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सकाळच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. टीव्ही-9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं धक्कातंत्र पाहायला मिळालं होते. पण हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं.

फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत अजित पवार अजूनही त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडत नाहीत, पण देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमका काय आहे फडणवीसांचा गौप्यस्फोट?
‘आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,’ असं फडणवीस म्हणाले.