जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक १६ मे रोजी झाली. या वेळी जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र ५.०५ लाख हेक्टर असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांच्या पाकिटांची मागणी ठरवण्यात आली होती. त्यानुसार कृषी विभागाने २५ लाख पाकिटांची मागणी नोंदवली आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यंदा बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. लिंकिंग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी तालुकास्तरावर १५ तर जिल्हास्तरावर एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. याबाबत तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. कृषी मित्र, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, पोलिस पाटील यांच्यामार्फत लिंकिंगवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच हवामान यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना करत आवश्यक ठिकाणी नवीन यंत्र बसवण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
यंदा सर्वाधिक क्षेत्र कापसाचे
यंदा जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक लागवड कापसाची होणार आहे; परंतु या एकाच पिकावर अवलंबून न राहता तूर, उडीद, मूग हे आंतरपीकही घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल घेऊन ते जपून ठेवावे, असे कृषी विभागातर्फे कळवण्यात आले आहे. आहे.
अशी मागवली बियाणे पाकिटे
कापूस (५०५०००), मका (२१६००), सोयाबीन (११५५५), ज्वारी (२०२८), तूर (८८०), उडीद (७८८), बाजरी (२८४).