जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर आता राज्यात मान्सून पूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुढचे ३ दिवस हा पाऊस असाच धुमाकूळ घालण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यातच महाराष्ट्रावर नवीन संकट ओढवले आहे.

महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय, पुढील ३६ तासांत चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.हे कमी दाबाचे क्षेत्र सायकलॉन सर्क्युलेशची स्थितीमुळे उत्तरेकडे तीव्र वेगाने सरकतंय.
या चक्रीवादळामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीस मनाई केली आहे. पूर आणि पाणी साचण्याची भीती असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान हवामान खात्याने आज (२२ मे रोजी) रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोकणपट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर राज्यातील इतर भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने कले आहे.
जळगावात कशी राहणार स्थिती?
जळगाव जिल्ह्यात मागच्या तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. तर सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज गुरुवारी पहाटपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना उकाड्यातून दिलासा मिळत आहे.