जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ । एकीकडे अवकाळी पावसाने केळी पिकांना मोठा फटका बसला असून केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच एमपी मधील बऱ्हाणपूर बाजार समितीत केळीचे भाव मुद्दाम कमी करण्याचे षडयंत्र संबंधित यंत्रणेकडून रचण्यात आल्याची शंका शेतकऱ्यांना आहे. दोनच दिवसात क्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांची घसरण झाली. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना एका गाडीमागे तब्बल ७५ हजार रुपयांचा फटका बसत आहे

खान्देशातील जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या केळीचे भाव ठिठठिकाणच्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून दररोज जाहीर केले जात असले, तरी व्यापारी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीकडून काढले जाणारे भाव प्रमाण मानतात. याव्यतिरिक्त संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांचेही बऱ्हाणपूरच्या केळी भावाकडे लक्ष असते. त्यामुळे बऱ्हाणपूरमध्ये केळीच्या भावात थोडाजरी चढ-उतार झाला तरी संपूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटतात.
याच गोष्टीचा फायदा उचलून बऱ्हाणपूर बाजार समितीत सध्या मनमानी पद्धतीने केव्हाही आणि कितीही केळीचे भाव वाढविण्याचे आणि कमी करण्याचे उद्योग तिथे बसलेली यंत्रणा करत असल्याने केळी उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दोन दिवसातील केळी भावाची आकडेवारी लक्षात घेता, शुक्रवारी बऱ्हाणपूरमध्ये केळीचे भाव ३०३५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी शनिवारी केळीचे भाव २५०० रुपयांपर्यंत खाली आले. रविवारी पुन्हा त्यात ५० रुपयांची घट झाली.
केळी दरात एकदम ५०० रुपयांनी घसरल्यानंतर शेतकऱ्यांना एका गाडीमागे (१५० क्विंटल) सुमारे ७५ हजार रुपयांची आर्थिक झळ बसली आहे. भाव वाढत असताना शेतकरी आणखी चांगल्या भावाच्या आशेने इतके दिवस केळीची कापणी करत नव्हते. मात्र, दोनच दिवसात ५०० रुपयांनी भाव कमी झाल्यानंतर शेतकरी आता आणखी भाव कमी होण्याच्या भीतीने केळी कापणीसाठी घाई करू लागले आहेत. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच जास्त करून होत आहे.