जळगाव लाईव्ह न्यूज । वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले दर, रासायनिक खतांच्या किंमतींमध्ये झालेली वाढ आणि शेतकऱ्यांच्या रात्रीच्या वीजपुरवठ्यात करण्यात आलेली कपात या मुद्द्यांवरून आज जळगाव शहरात काँग्रेसने आक्रमक आंदोलन छेडले. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील पांडे चौक परिसरातील पेट्रोल पंपासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्ग आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विशेषतः शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्यात कपात केल्यामुळे शेती संकटात सापडत असल्याचे सांगत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, शहराध्यक्ष जमील शेख तसेच हारून मुफ्ती नदवी यांनी केले. यावेळी सरकारने इंधन दरवाढ, खतांच्या किंमती आणि वीज कपातीसारखे निर्णय तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही काँग्रेस नेत्यांनी यावेळी दिला.











