⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील पाण्याची तक्रार थेट पंतप्रधानांकडे

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । धरणगाव पालिकेतर्फे शहराला सध्या १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, अशी तक्रार येथील संजय एकनाथ माळी (रा.हनुमान नगर) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

अधिक माहिती अशी की, सध्याच्या परिस्थितीत धरणगाव शहराला १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा स्थानिक नगरपालिका करत आहे. यामुळे भविष्यात धरणगावकर नागरिकांनी टंचाई जाणवू नये, अशी उपाययोजना करावी. नियमितपणे पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. तसेच धरणगावचा पाण्याचा प्रश्न स्वातंत्र्यपासून आजपर्यंत मिटलेला नाही. तरी सदर विषयावर त्वरित पाठपुरावा करून, नियमित पाणीपुरवठ्याची सुविधा द्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

यांनाही निवेदन

पंतप्रधानांसह पत्राची प्रत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीन देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना पाठवली आहे. दखल घेण्याची मागणी केली आहे.