⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आ.महाजन यांच्याकडून दूध संघावर राजकीय द्वेषापोटी समिती : आ.खडसेंचा मोठा आरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । राजकीय हेतूने आ.गिरीश महाजन, एन.जी.पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्री यांनी समिती नेमली आहे. मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी हे केले जात आहे. संचालक मंडळ बरखास्त करायचे होते तर त्याची चौकशी होणे, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणे आवश्यक होते. परंतु असे काहीही झालेले नाही. कारवाई बेकायदेशीर आणि राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असा आरोप माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी केला आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोवर मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटते. न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तर तर सरकार कोसळू शकते, असे खडसे म्हणाले.

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघावर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून दूध संघातील भ्रष्टाचाराच्या चौकशीकामी समिती गठीत करण्यात आली आहे. माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांना हा आ.गिरीश महाजनांचा धक्का मानला जात आहे. खडसे आज जळगावात आले असून पत्रकारांशी संवाद साधला.

खडसे म्हणाले, जळगाव जिल्हा दूध विकास संघावर प्रशासक मंडळ नियुक्ती करणे आणि दूध संघावरील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमणूक करण्यात आली. दूध संघ १९९५ मध्ये विक्रीस निघाला होता. अशा स्थितीत मी मंत्री असताना तो एननडीडीबी कडे सोपविला. पुढे लोकनियुक्त संचालक मंडळाची निवड करून त्यांनी दूध संघाची स्थिती सुधारली. आज दूध संघाचे भाग भांडवल १५ कोटींच्या वर गेले आहे. आज दररोज ४ लाख लीटर दूध रोज येते. एकूण २५ कोटी नफ्यापर्यंत दूध संघ पोहचणार आहे, असे खडसे म्हणाले.

खडसे पुढे म्हणाले, १९९९ मध्ये एन.जी.पाटील कार्यरत होते. विविध कारणांसाठी त्यांना बदतर्फे करण्यात आले. आजवर त्यांनी ५० तक्रारी केल्या आहेत. बडतर्फ कर्मचाऱ्याच्या अर्जावर चौकशी नेमाने याची अभ्यास व्हायला हवा. दूध संघात एकही व्यक्तीची भरती झाली नाही तर भ्रष्टाचार होणार कसा? निवड झालेल्या उमेदवारांची यादी न्यायालयात गेली असून हा प्रश्न न्याय प्रविष्ठ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दूध संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून न्यायालयाने दि.३० सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सहकाराच्या एका नियमानुसार निवडणूक होईपर्यंत संचालक मंडळ कार्यरत राहू शकते. उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून न्यायालयाने दावा स्वीकारला आहे. सोमवारी त्यावर कामकाज होणार असल्याची माहिती खडसेंनी दिली आहे.

माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांची पत्रकार परिषद :