⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

गिरणा नदी काठावरील नागरिकांनो सावधान ! जिल्हा प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ राज्यासह जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. याचदरम्यान, आज १४ जुलै रोजी गिरणा धरणात दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होणार असून दुपारनंतर धरणातून गिरना नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणाच्या जलसाठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. यापूर्वी रात्री हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. आज गुरुवारी दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होणार असून धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरना धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरना नदीत सोडण्यात येणार आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल.

साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २०००० क्यूसेक इतका राहील व त्यानंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १००००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणाऱ्या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो ,तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरना पाटबंधारे विभाग, जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.