जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२५ । शेततळ्यात तरुणांसह बालक मजुरांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे शेत शिवारात घडली. रवी परभत कोळी (वय १४) व अंतुर्ली येथील पदमसिंग भगवान पाटील (वय २१) असे बुडून मृत झालेल्या दोघांचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याघटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत असे की, पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील रवी कोळी (वय १४) व पदमसिंग पाटील हे दोघेजण शेत मजुरीचे काम करत होते. शेतात गेले असताना तारखेडा रस्त्यावरील अंतुर्ली बुद्रुक शिवारातील शेततळ्याच्या पाण्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोघांचे मृतदेह आढळले. शेततळ्यात पाय घसरल्याने ते पडले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तर सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यानंतर ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतांमधील पद्मसिंग पाटील घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असल्याने घरात कमावणारा एकटा पुरुष होता. आई व विवाहित बहिणी समवेत तो राहत होता. मिळेल ती कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होता. त्याच्या मृत्यूमुळे आई व बहिणीने एकच आक्रोश केला. तर रवींद्र कोळी याच्या मागे आईवडिल, दोन भाऊ असा परिवार आहे.