जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । मागच्या काही महिन्यापासून खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. अशातच खाद्यतेलाच्या महागाईतून होरपळणाऱ्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटी कमी केली आहे.

केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूळ कस्टम ड्युटी निम्म्याने कमी केली आहे. पूर्वी या तेलांवर २० टक्के शुल्क आकारले जात होते, जे आता १० टक्के करण्यात आले आहे. यामुळे खाद्य तेलाचे भाव कमी होणार आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी एक परिपत्रक काढले. त्यात म्हटले की, खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी कच्या खाद्य तेलावरील बेसिक कस्टम ड्यूटीमध्ये 10 टक्के कपात केली आहे. हा बदल 31 मे पासून लागू असणार आहे. भारत वनस्पती तेलापैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त तेल आयात करते. ही आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसारख्या देशातून पाम तेलच्या माध्यमातून होते. तसेच अर्जेंटीना, ब्राझील, रशिया आणि यूक्रेनकडून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. सरकारने करात कपात केल्यामुळे आता खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार आहे.
किती टक्के कर झाला कमी
सरकारने कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल यावरील सीमा शुल्क 20 टक्क्यांवरुन 10% केले आहे. तिन्ही तेलाचे इंपोर्ट शुल्क पूर्वी 27.5 टक्के होते. आता ते 16.5% करण्यात आले आहे.
दरम्यान सप्टेंबर 2024 मध्ये भारत सरकारने कच्चे आणि रिफाइंड वनस्पती तेलांवर 20 टक्के सीमा शुल्क लावले होते. तसेच कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावर 27.5 टक्के आयात शुल्क लावले होते. पूर्वी हे शुल्क 5.5 टक्के होते.